Vaari - 19th July, 2026 (Organized by Chitpawan Foundation, Navi Mumbai)

Back to Programs

वारी - रविवार, १९ जुलै, २०२६.....

मागच्या वर्षी प्रमाणे याही वर्षी चित्पावन फाउंडेशन, नवी मुंबई च्या वतीने आषाढी एकादशीच्या आधी वारीचे / दिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

रविवार, १९ जुलै, २०२६ रोजी वारीचे आयोजन करण्यात आले होते.

मागीलवर्षीपेक्षा या वर्षी जास्त संख्येने आणि तितक्याच उत्स्फुर्तपणे आणि उत्साहाने लोक वारीत सामील झाले होते. पाऊस असूनसुद्धा जवळपास 250 पेक्षा जास्त भक्तांचा सहभाग वाखाणण्याजोगा होता.

पुरुषांसाठी, पांढरा कुर्ता- पायजमा, टोपी बायकांसाठी- सलवार कुर्ता किंवा साडी अशी वेशभूषा ठरवली होती.

सकाळी ठीक 7 वाजता सर्वांनी "ज्वेल ऑफ नवी मुंबई" नेरुळ, च्या मेन गेट वर जमायचे होते (जिथे फ्लेमिंगोचा मोठा पुतळा उभारलेला आहे)

नंतर तिथून डावीकडे चालायला सुरवात करून, आगरी कोळी भवन, वझिरांनी जिमखान्या वरून परत U टूर्न मारून, आलेल्याच रस्त्याने, श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात (नेरुळ) वारकरी पोहोचले. हा मार्ग साधारण 2.5 किलोमीटर लांबीचा आहे.

दोन वर्षांपूर्वी मंदिरातून आपल्या गाडीपर्यंत पोचण्यासाठी रिक्षा वगैरे उपलब्ध न झाल्यामुळे बऱ्याच जेष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला, असं समजल्यानंतर कमिटीने हा त्रास टाळण्यासाठी,यावर्षी ज्वेल वरून निघून परत ज्वेल च्या गेट वर असा मार्ग निवडण्यात आला होता.

वारकऱ्यांनी सोबत झांजा, टाळ, झेंडे आणले होते. विठुरायाच्या गजरात वारकरी भक्तिभावाने तल्लीन झाले होते. सर्व वयोगटातील स्त्रिया आणि पुरुषांचा सहभाग होता. वारीमध्ये रोटरी क्लब, वाशीचे काही मेंबर्सही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

विठ्ठल मंदिरात पोचल्यावर तिथे विठुरायाच्या नामाचा जयघोष करून सर्वांनी विठ्ठल-रखूमाईचे दर्शन घेतले.

ह्यावर्षी आपल्या चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई च्या कोर कमिटी मधील काही सभासदांनी अतिशय सुश्राव्य असा भजनांचा कार्यक्रम सादर केला. त्यामध्ये सौ. सानिका ताम्हनकर, डॉ. श्री. आमोद ताम्हनकर, डॉ. श्री. प्रतीक साठे, सौ. माधवी गानू, श्री. मंदार लिमये, श्री. अभि गद्रे, श्री. शशांक चितळे ह्यांनी सहभाग घेतला होता. पेटीवर श्री. मंथन व तबल्यावर श्री. रूपक ह्यांनी समर्पक साथसंगत केली.

मागीलवर्षी प्रमाणे ह्याही वर्षी अनेक जणांनी प्रसादाच्या साबुदाणा खिचडी किंवा चहा/कॉफीचा खर्च देण्याची इच्छा दर्शवली होती त्यामुळे ह्या खर्चासाठी ऐच्छीक वर्गणी घ्यायचे CFNM च्या कोर कमिटी तर्फे ठरवले होते. ज्यांना कोणाला वर्गणी द्यायची इच्छा होती त्यांनी ती रोख रकमेच्या स्वरूपात सौ. सायली नेने आणि श्री. प्रसन्न जोग यांच्याकडे सुपूर्त केली.

तरुण पिढीलाही या वारीमध्ये सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले होते जेणेकरून त्यांचाही सहभाग वाढेल.

त्यानंतर श्री गणपती, विठ्ठल रखुमाई, शंकर पार्वती, महिषासुरमर्दिनी, दत्तगुरु यांच्या आरत्या म्हणण्यात आल्या व प्रसाद वाटप करण्यात आले. चित्पावन फाऊंडेशन, नवी मुंबई तर्फे साबुदाणा खिचडी,चहा/ कॉफी व पेढ्यांचा प्रसाद देण्यात आला. (Catering by ASAP Foods in CFNM group - सौ. प्राजक्ता परांजपे, श्री अभी गद्रे)

आपल्या वारीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे वारी मध्ये फक्त चित्पावन किंवा ब्राह्मण समाज अशा मर्यादा न ठेवता समाजातील सर्वांना सामावून घेण्यात आले होते. ह्यातून चित्पावन परिवाराचे समाजातील सर्व स्तरातील लोकांसाठी असलेला बंधुभाव तसेच आपल्या सामाजिक, सांस्कृतिक प्रथा/ चालीरीती सांभाळणे, मराठी भाषिक किंवा त्याहीपलीकडे जाऊन सर्वसमावेशक पद्धतीने एकोपा राखण्याचे उद्दिष्ट अधोरेखित होते.

आयोजनाच्या दृष्टीने प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी जरी हे शक्य नसले तरी जेव्हा जेव्हा शक्य असेल तसेच सार्वजनिक हिताच्या दृष्टीने गरजेचे असेल तेव्हा चित्पावन परिवार त्याकडे बंधुभाव व आपुलकीच्या दृष्टिकोनातूनच पाहतो.

या वारीच्या कार्यक्रमाच्या संयोजनात श्री. मिलिंद गानू, सौ. सायली नेने, श्री. संतोष नेने, डॉ. श्री. आमोद ताम्हनकर, तसेच बाकीच्या कोर कमिटी मेंबर्स चा सहभाग होता.

तसेच वारीमध्ये उपरणे वाटप, गंध/टिळा लावणे, मंदिरात प्रसाद वाटप इत्यादी कामांसाठी आपल्या चित्पावन परिवारातील सदस्यांनी स्वेच्छेने जबाबदार्‍या स्विकारल्या होत्या ; त्यामध्ये अथर्व ताम्हनकर, ऋचा चितळे, यशराज नेने, सानिका जोशी, शौनक जोशी, प्रीती डोंगरे, प्रदीप डोंगरे, अमोल देवधर,आदिती देवधर,गौरी जोशी, चित्रा भातखंडे, पल्लवी रेखी ह्यांचा समावेश होता.

असे धार्मिक कार्यक्रम एकत्र येऊन साजरे करणे, हे समाजातील एकात्मता आणि निकोप मानसिकतेचा विकास व्हावा, यासाठी गरजेचे असतात.

Chitpavan Foundation. All Rights Reserved.